
एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेजची “घवघवीत यशाची परंपरा कायम; शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के!”
“यशाचा नवा विक्रम! शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी”
नाशिक -येवला दि. ८ मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत बाभुळगाव येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने दरवर्षीप्रमाणे यंदाही 100% निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण 132 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 130 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर उर्वरित 02 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी गुणांसह यश संपादन केले आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. अवंती नारायण पाटील हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. गितेश अंबादास गवळी याने 93.80 टक्के गुणांसह द्वितीय, कु. तनुजा दिलीप गायकवाड हिने 93.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला, कु. अस्मिता हेमंत खोटरे हिने 93.40 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला, तर कु.गौरी रमेश भोये 93.00 टक्के मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे नियमित अध्ययन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेने राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा मोठा वाटा असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव परीक्षा, अतिरिक्त तासिका, मार्गदर्शन शिबिरे, तज्ज्ञांचे व्याख्यान, विषयानुसार स्वतंत्र शंका निरसन वर्ग तसेच मानसिक तणावमुक्तीसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार मा.किशोर भाऊ दराडे, सचिव मा.लक्ष्मण भाऊ दराडे, संचालक मा.रुपेश भाऊ दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री.समाधान झाल्टे सर, समन्वयक श्री.सुनील पवार सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.निलेश शिंदे सर,उपमुख्याध्यापक श्री.संदीप पाटील सर,वर्गशिक्षक श्री.बंड सर श्रीमती.शेळके मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले असून भविष्यातही शाळा गुणवत्ता वृद्धीसाठी कटिबद्ध राहील,” असे प्रतिपादन मुख्याध्यापकांनी केले.














