वादळाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
आमदार आशुतोष काळेंच्या प्रशासनाला सूचना
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यात शुक्रवार दि.२२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तू उघड्यावर पडल्या तसेच फळबागांचे आणि उघड्यावर ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची माहिती घेऊन आ. आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला वादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे.

शुक्रवारी सायंकाळी कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांना या वादळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले तर काही घराच्या भिंती कोसळल्या आहे. तसेच फळबागांसह काढणीला आलेल्या डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले. वादळाने साठवणुकीसाठी झाकून ठेवलेल्या कांद्यावरचे आच्छादन उडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नेहमी प्रमाणे राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. मतदारसंघातील एकही बाधित नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. पंचनामे करतांना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई न करता पंचनामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.














