कोपरगाव तालुक्यात वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
आमदार आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाला सूचना
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव :- शनिवार (दि.०६) रोजी कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना पुन्हा एकदा शनिवार रोजी झालेल्या वादळाचा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळाच्या नुकसानीतून सावरत नाही तोच पुन्हा आलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावात आलेल्या वादळामुळे नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून संसारोपयीगी साहित्याचे नुकसान झाले तसेच जनावरांच्या गोठ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रीन हाऊस,कांद्याच्या चाळीचे छत, पॉली हाऊस यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक मोठमोठी झाडे वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे महावितरणचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होवून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला.
झालेल्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करा व पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी राहणार नाही याची काळजी घेवून झालेल्या नुकसानीचा अहवाल वेळेत तयार करा. सर्व नुकसानग्रस्त नागरीकांना व शेतकऱ्यांना महायुती शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यानी सांगितले आहे.














