गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या – आ.थोरात
इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केली नुकसानग्रस्त गावांची पाहणी
संगमनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पश्चिम भागातील पेमगिरी, निमगाव बुद्रुक, सांगवी, सावरचोळ, नांदुरी दुमाला या गावांमध्ये अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. पावसानंतर इंद्रजीत भाऊ थोरात यांनी तातडीने या भागाची पाहणी केली असून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
शनिवारी चारच्या सुमारास नांदुरी दुमाला,सांगवी, सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, शिरसगाव,धुपे या गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी इंद्रजीत भाऊ थोरात, सोमनाथ गोडसे, बाळासाहेब कानवडे, संजय कानवडे, मनीष गोपाळे, भास्कर गोपाळे, ॲड मिनानाथ शेळके, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कृषी सहाय्यक यांनी केली.
शनिवारी पश्चिम भागातील विविध गावांमध्ये गारपिटीने मोठे नुकसान झाले. यामध्ये शेतीत उभे असले चारा पीक विशेषता मका, घास याचबरोबर झेंडू फुले, टोमॅटो यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्याने घरांची पडझड झाली आहे. आणि घरांचे पत्रे उडाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची इंद्रजीत भाऊ थोरात यांनी तातडीने पाहणी केली.
या नुकसानीची माहिती मिळताच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला तातडीने सर्व नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना सर्वोत्तपरी जास्तीत जास्त मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी बोलताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, शेतकरी हा अनंत अडचणीत असून शेतमालाला भाव नाही. त्यातच अशा अवकाळी पावसाने हातात आलेल्या पिकाची पूर्ण नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आपत्ती असून शासनाने फक्त घोषणा न करता तातडीने जास्तीत जास्त मदत या सर्व शेतकऱ्यांना केली पाहिजे. या शेतकऱ्यांच्या मदतीकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे ही पाठपुरावा करणार असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल याकरता आपणही प्रयत्न करू असे आश्वासित केले. यावेळी अनेक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिलासा दिला.