संस्था मोठी होणे हे संस्थापकांच्या कष्टाचे व त्यागाचे चीज-आमदार आशुतोष काळे
मान्यवरांच्या उपस्थितीत सोनेवाडी सोसायटीचा नामकरण सोहळा संपन्न
कोळपेवाडी वार्ताहर :- कोणतीही सहकारी संस्था स्थापन करणे अतिशय अवघड असून त्यापेक्षा संस्था स्थापन केल्यानंतर ती संस्था योग्य पद्धतीने चालविणे तर त्याहीपेक्षा अवघड आहे.त्यामुळे संस्था कोणतीही असो ती फक्त इमारतीने मोठी होत नाही, तर त्या संस्थेमागे उभे असलेले कार्यकर्ते, त्यागी माणसांच्या कष्टातून ती संस्था मोठी होते व त्या संस्थेचा फायदा सर्वसामान्य नागरीकांना होतो. त्यावेळी ज्या उद्देशातून संस्था स्थापन करण्यात आली,त्यासाठी ज्यांनी कष्ट सोसले, त्याग केला त्या संस्थापकांच्या कष्टाचे आणि त्यागाचे खऱ्या अर्थाने चीज होते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे कै.अर्जुनराव पंढरीनाथ पा.माळशिकारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सहकारी संस्थांचा आदर्श कारभार कसा करायचा याचा वस्तुपाठ कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपल्याला घालून दिला असून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात मोठे काम केले आहे.त्याप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब जावळे यांनी देखील सोनेवाडीमध्ये शाळा सुरु करून त्या शाळेला कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे नाव दिले. त्यामुळे त्यांनी सोनेवाडी व परिसराला कधीही कर्मवीर शंकररावजी काळे समाजकारणाचा विसर पडू दिला नाही व काळे परिवार देखील काकासाहेब जावळे यांना कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, माजी उपाध्यक्ष विश्वासराव आहेर, बाळासाहेब कदम, कारभारी आगवन, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, राजेंद्र गिरमे, बाळासाहेब बारहाते, भास्करराव चांदगुडे, सुनिल शिंदे, अरुण चंद्रे, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, डॉ.मच्छिन्द्र बर्डे, दिलीपराव बोरनारे, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, संचालक रावसाहेब चौधरी, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन विजयराव रक्ताटे, संचालक बाबुराव थोरात, भाऊसाहेब गावडे (बारामती), कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संचालक किसनराव पाडेकर, रामनाथ आव्हाड, गंगाधर खोमणे, तुकाराम गुडघे, बाळासाहेब जपे, बाबासाहेब फटांगरे, शिवाजीराव जावळे, व्यंकटराव राऊत, सोपानराव गुडघे, सोसायटीचे चेअरमन यमाजी जावळे, व्हा.चेअरमन प्रविण जायपात्रे, सचिव विठ्ठलराव जावळे, संचालक भाऊसाहेब माळशिकारे आदींसह संस्थेचे संचालक, पंचक्रोशितील सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जिरायती भागातील गावांना पाणी आणण्यासाठी मला पाटकऱ्यासारखे उन्हातान्हात फिरावे लागले हे आपणा सर्वाना माहिती आहे. त्याची फलश्रुती म्हणून कडक उन्हाळ्यात देखील एकाही गावाची पाण्याच्या टँकरची मागणी नाही. परंतु काहींना पाणी कोणत्या पॉइंट मधून सोडायचे हे माहिती नाही. कोणत्या बंधाऱ्यातून कोणत्या बंधाऱ्यात पाणी जाते याची पूर्ण माहिती नाही तरी देखील श्रेय घेण्यासाठी काहींनी निवेदन स्वीकारून आम्हीच बंधारे भरून दिले असल्याचे लोकांना भासवत आहे. तेच उद्या आम्हीच सह्यांचे निवेदन दिल्यामुळे एमआयडीसी आली असे म्हणायला मागे पुढे पाहणार नाही.-आमदार आशुतोष काळे.














