५० वर्षांचा अन्याय संपवून मुस्लिम समाजाला हक्काचे गाळे दिले – इरफान शेख
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी): मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जर कुणी केले असेल, तर ते राजाभाऊ झावरे यांनीच केले आहे. राजाभाऊ झावरे हे शब्दाला जागणारे नेते असून त्यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून मुस्लिम समाजाला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख यांनी केले.


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे तसेच प्रभाग क्रमांक १ व २ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार गायकवाड स्नेहा जनार्धन, आवारे दादा रखमाजी, पवार योगेश छबुलाल, शेख फमिदा हसम यांच्या प्रचारार्थ खडकी येथे आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल तिपायले होते.
इरफान शेख पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी व्यवसाय करणाऱ्या विस्थापित टपरीधारक मुस्लिम समाजाला तब्बल ५० वर्षे कोणत्याही नेत्याने न्याय दिला नाही. मात्र राजाभाऊ झावरे यांनी नगराध्यक्ष असताना त्या सर्वांना पक्के गाळे उपलब्ध करून देत त्यांचे पुनर्वसन केले. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुलाच्या माध्यमातून बांगडी चाळ येथील मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय व्यावसायिकांना सुरक्षित व्यवसायाची संधी देण्यात आली.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक गरजांसाठी जुन्या सायन्स कॉलेजमध्ये उर्दू शाळेसाठी आठ वर्ग उपलब्ध करून देण्यात आले. तसेच दफनभूमीसाठी जागेचा प्रश्न स्व. शहरप्रमुख याकूब शेख यांनी उपस्थित केल्यानंतर राजेंद्र झावरे यांनी तात्काळ नवीन दफनभूमीस मंजुरी दिली. रिक्षासेनेत ५० टक्के मुस्लिम समाजाचा सहभाग ठेवत सी.बी.एस. मशिदीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली, हेही त्यांनी अधोरेखित केले.
शेख म्हणाले की, मुस्लिम समाजात दारू व दारूच्या पैशाला हराम मानले जाते. भ्रष्टाचार व दारूच्या पैशावर चालणारे उमेदवार आम्हाला नको आहेत. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निर्व्यसनी आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय बांधव राजाभाऊ झावरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना नगराध्यक्ष पदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यावेळी विमल पुंडे म्हणाल्या की, विरोधक पैशाच्या जोरावर लोकांना सभेसाठी आणत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यांचे पैसे घ्या, मात्र मतदान करताना धनुष्यबाण या चिन्हावरच मत द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ झावरे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांना निवडून देऊन स्वाभिमानाने जगायचे आहे व महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट करायचे आहेत. कार्यक्रमास किरण खर्डे, दत्ता पुंडे, बाबुराव पवार, विकास शर्मा, विशाल झावरे, राहुल देशपांडे, दिलीप सोनवणे, ॲड. शंकर यादव, अभिजित जाधव, अमजद शेख, दिगंबर गवळी, संतोष झावरे, रवी पवार, रवी आठरे, वैभव चव्हाण, बंटी बोर्डे आदी उपस्थित होते.
५० वर्षे नगरपालिकेपासून आमदार, खासदार, मंत्री पदे भोगूनही काळे-कोल्हे यांनी कोपरगावचा विकास केला नाही. विकास नव्हे, तर फक्त टक्केवारीसाठी त्यांना पालिका हवी आहे. पन्नास वर्षे त्यांनी फक्त एकमेकांशी जिरवाजिरवी केली.” — राजेंद्र झावरे














