समता, बंधुता आणि एकात्मतेची सामाजिक मूल्ये रुजवावे :- डॉ. सुधीर तांबे
संगमनेर: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८०वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, एन.सी.सी. पथकाचे निरीक्षण, विद्यार्थ्यांची कवायत, विविध उपक्रम तसेच गुणवंतांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुधीरजी तांबे यांनी समता, बंधुता आणि एकात्मतेची सामाजिक मूल्ये समाजात रुजविण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदेमातरम्, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. एन.सी.सी. पथकाचे निरीक्षण करण्यात आले. शिस्तबद्ध संचलन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.एम. खेमनर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या अभिभाषणात डॉ. सुधीर तांबे यांनी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता एवढाच मर्यादित नसून सामाजिक समता, बंधुता, एकात्मता आणि प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण यामध्ये असल्याचे प्रतिपादन केले. “समता, बंधुता आणि एकात्मतेची सामाजिक मूल्ये रुजविण्यासोबतच सर्वांना मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रामाणिकपणा आणि परीक्षेतील ताण कमी करण्याबाबतही जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षा’ घेण्याची प्रतिज्ञा घेतली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासोबतच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांतर्गत ईश्वर भरीतरकर या विद्यालयाच्या विद्यार्थ्याने रेखाटलेले डॉ. सुधीर तांबे यांचे व्यक्तिचित्र त्यांना भेट देण्यात आले. विद्यार्थ्याच्या कलाकौशल्याचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी शैक्षणिक व संस्थात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत क्षीरसागर सर आणि पवार मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास प्राचार्य बाबासाहेब वाघ, प्राचार्य सखाराम खेमनर, उपप्राचार्य नंदू काळे, उपमुख्याध्यापिकक सुरेखा दिघे पर्यवेक्षक किशोर देशमुख , अण्णासाहेब दिघे,भास्कर कुटे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करताना राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, शिस्त, समता आणि बंधुतेची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.














