परिसर सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पुढे यावे – नगरसेवक जनार्दन कदम व निर्मलाताई आढाव आवाहन
कोपरगाव मनिष जाधव – शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही अज्ञात व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती समोर आली आहे. परिसराची हेरगिरी करून मोटारसायकल चोरीसारख्या घटना घडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून यामुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक जनार्दन कदम व निर्मलाताई सोमनाथ आढाव यांनी केले आहे.

नागरिकांनी आपली मोटारसायकल व इतर वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून व्यवस्थित लॉक करावीत, तसेच अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती परिसरात फिरताना दिसल्यास तात्काळ शेजाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला कळवावे, असेही त्यांनी सांगितले.
विशेषतः रात्रीच्या वेळेस अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था सुरू ठेवावी, तसेच रात्री उशिरा विनाकारण बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे सहकार्य केल्यास अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ मोबाईलद्वारे संपर्क साधावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
नागरिकांनी जागरूक राहून परस्पर सहकार्याची भूमिका घेतल्यास परिसर सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होईल, असेही नगरसेवकांनी स्पष्ट केले.













