आपला जिल्हानिवडणुक

सावधान, रात्र वैर्‍याची आहे…

मनिष जाधव 9823752964

सावधान, रात्र वैर्‍याची आहे…

 

प्रविण पुरो पोलखोल

सुरू असलेल्या लोकसभा निवडणुच्या अंतिम टप्प्याचं मतदान जवळ येईल, तस तसं देशात काहीही घडू शकतं. वारं फिरलं आहे, रात्र वैर्‍याची आहे. सत्ताधारी भाजप काहीही करू शकतं, कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतं. लोकशाही वाचवणार्‍या प्रत्येकासाठी हे आव्हान होय. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना केलेलं हे आवाहन पुरतं बोलकं आहे. अनुभवाचे बोल हे असेच आहेत. कोणतीत्याही निवडणुकीच्या तोंडावर असंच काहीबाही होत आलंय. 2014ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये झालेल्या दंगली भाजपने पथ्यावर पाडून घेतल्या. पुढे पुलवामात सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्याचा फायदा त्या पक्षाने घेतला. वातावरण विरोधात असताना भाजप तीनशे पार गेला. वातावरण विरोधात गेलं की ऐनवेळी भाजप काहीही करू शकतं, हा पूर्वानुभव प्रत्येक भारतीयाच्या अंगवळणी पडला आहे. यामुळेच बदलत्या परिस्थितीत निवडणुकीच्या यशासाठी काहीही घडवून आणलं जाईल, या भीतीला जरूर आधार आहे. जिथे अडचणी आहेत तिथलं मतदान पाच टप्प्यात आणि जिथे अडचणी नाहीत तिथे एका टप्प्यात मतदान उरकण्याची चालही याच प्रकारची. महाराष्ट्र, कर्नाटक, प. बंगाल ही राज्यं आजच्या परिस्थितीत अनुकूल राहिली नसल्याचं लक्षात घेऊन यंत्रणांना कामाला लावण्यात आलं. निवडणक आयोग सत्तेचा बटिक बनला आणि पाच टप्प्यात निवडणूक घेण्याची सोय साधली गेली. इतकं सारं करून परिस्थिती अनुकूल राहिली नसल्यानेच काहीही घडण्याची भीती व्यक्त होणं स्वाभाविक. तेव्हा मतदारांनो सावधान, रात्र वैर्‍याची आहे…

ऊ

देशात काँग्रेसची राजवट असेपर्यंत निवडणूक आयोगाला पाठीचा कणा होता. या यंत्रणेचा कोण दबदबा होता. निवडणुकीत वायफळ कारभार करणं कोणालाही शक्य नसायचं. टी.एन.शेषन यांनी तर सत्तेलाही नाक घासायला लावलं होतं. 1984 मध्ये अमिताभ बच्चन काँग्रेसच्या तिकिटावर निवडूक लढवत असताना त्यांचे चित्रपट सरकारी माध्यम असलेल्या टीव्हीवर दाखवायचे नाहीत, असं फर्मान आयोगाने काढलं होतं. तेव्हा सत्ता काँग्रेस पक्षाची होती. जनता दलाची सत्ता असताना त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह हे चक्र होतं. व्हील डिटर्जंट या वॉशिंग पावडरची जाहिरात टीव्हीवर दाखवली जायची. या जाहिरातीवर आयोगाने घेतलेला आक्षेप जुन्या जाणत्यांना अजून आठवतोय. या जाहिरातीवर तेव्हा बंदी घालण्यात आली होती. 1999 मध्ये राज्यात युतीची आणि केंद्रात एनडीएची सत्ता असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी धार्मिक प्रचार केल्याचा ठपका ठेवला. त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा आणि मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. 1987च्या विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांनी धार्मिक वक्तव्यं केलं होतं. 2014 च्या निवडणुकीत चंदीगढमध्ये एका पार्कात मोठा हाताचा पंजा होता. या हाताला बंदिस्त करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. तेव्हाही सत्ता काँग्रेस पक्षाची होती. घटनेने निवडणुकीवेळी धार्मिक प्रचारावर बंदी घातली आहे. पण सत्ता मोदींची आहे. आणि देशात माझ्याशिवाय कोणीही नाही, ही मानसिकता निर्माण झाली आहे. रामाच्या नावाने मतं मागणार्‍या सत्ताधार्‍यांविरोधी लेखी तक्रार होऊनही जाब विचारण्याची हिंमत आज आयोगात नाही. उलट शिवसेनेच्या प्रचार गीतात ‘हिंदू’ आणि ‘जयभवानी’ या वाक्यांवर आक्षेप घेतला गेला. आम आदमी पार्टीच्या प्रचार गीतात मुख्यमंत्री केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या तुरूंगवासाचा बदला मतदानात घेण्याच्या उल्लेखावर आयोगाने आक्षेप घेतला. कारण सत्ता भाजपची आहे. मतदान पार पडल्यावर होणार्‍या मतदानाचे सुधारित आकडे हे सरासरी 24 तासात जाहीर व्हायला हवेत, असं असूनही पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी 11 दिवसांनंतर बदलून ती सात टक्क्यांनी वाढल्याचं जाहीर करणं कशाचं द्योतक आहे? इतकं होऊनही आयोगाच्या आयुक्तांना काहीच वाटत नसेल तर सत्तेसाठी आयोग लाचार झालाय, असा आरोप हा होणारच.

झ
निवडणुकीची घोषणा व्हायच्या काही दिवस आधीच विरोधी पक्षांमधील ज्यांच्या विरोधी चौकशा सुरू केल्या त्या नेत्यांनी भाजपत प्रवेश घेतल्यावर कारवाया टाळण्यात आल्या. पण जे वाकले नाहीत त्यांना जेलवारी घडवून आणण्यात आल्या. भर आचारसंहितेत यंत्रणांचा वापर असा होत असेल तर लोकशाही नावाची संज्ञा वापरावी की नाही, असा सामान्य प्रश्‍न आहे.
पायाखालची वाळू सरू लागल्यावर जो तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. मोदींची सत्ता बेमालूम बनल्याचा फटका या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बसू शकतो, याचे संकेत मिळू लागल्यापासून सत्ताधारी सुटल्यागत वक्तव्यं करू लागले आहेत. विशेषत: मोदींच्या वक्त्यव्यांनी सार्‍या देशाला अचंबित करून सोडलं आहे. आजवरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचे पंतप्रधान आपण केलेल्या कामाची आणि हाती घ्यावयाच्या योजनांची उत्तम मांडणी करायचे. देशापुढील आव्हानं आणि जागतिक स्तरावरील स्थान या मुद्यांवर मतं मागायचे. याला अपवाद विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींनी प्रचार इतक्या खालच्या पातळीवर नेला की इतिहासात याही गोष्टीची नोंद होईल, हे सांगायला नको. देशापुढील समस्यांवर वा आगामी योजनांवर ब्र न काढता मोदींनी वायफळ बडबड केल्याचं प्रचारात ऐकायला मिळालं. बारामतीत जाऊन ज्या पवारांना गुरू संबोधलं त्याच पवारांना निवडणुकीच्या प्रचारात ‘भटकता आत्मा’ म्हणण्यापर्यंतची मजल मोदींच्या प्रचाराने मारली. पंतप्रधान पदाची गरीमा जाणार नाही, याची खबरदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने घ्यायची असते. आपण म्हणजे अमित शहा, शेलार, फडणवीस नाहीत, हे त्यांनी देशाला दाखवून द्यायला हवं होतं. ती गरीमा मोदींनी अक्षरश: पायदळी तुडवली. उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची ‘नकली संतान’ असं संबोधत मोदींनी आपली लायकी सिध्द केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात आपल्याला अधिकाधिक संधी मिळावी म्हणून आजवरच्या पंतप्रधानांनी चारहून अधिक सभा घेतल्याचे दाखले इतिहासात नाहीत. मोदींनी या राज्यात तिसर्‍या टप्प्यांपर्यंत 16 सभांचा विक्रम केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं अस्तित्व संपवूनही अपेक्षित यश मिळत नाही, असं दिसू लागल्यापासून मोदींनी स्वैराचाराचा मार्ग स्वीकारलेला दिसतो आहे. ‘भटकता आत्मा’ म्हणून ज्या पवारांची नोंद त्यांनी केली त्याच पवारांना आठवडाभरात आपल्याकडे येण्याचं निमंत्रण देऊन टाकलं. ज्या उध्दवना ‘नकली संतान’ संबोधलं त्याच उध्दवना कोणतीही मदत हवी तर सांगा मी आहे, असं आठवडाभरापूर्वी सांगणारे मोदी इतके खाली येऊ शकतात, यावर कोणाचा विश्‍वासच नाही. यामुळेच यशासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतील, आणि आयोग ते उघड्या डोळ्याने पाहण्याचं तेवढं काम करेल, यात संदेह नाही. पीएम केअर फंडाद्वारे पैशांची वाटमारी करणारा, इलेक्ट्रोल बॉण्डद्वारे अगणित भ्रष्टाचार करणारा म्हणून मोदींचा होत असलेला उल्लेख त्यांना आता स्वस्त बसू देत नाही. मोदींच्या सत्तेचा वाटेकरी देशातील सामान्य माणूस राहिलाय, असं सांगायची सोय राहिलेली नाही. सारं काही आदानी आणि अंबानी यांना स्वाहा करण्याच्या विकृतीने भारताची अवस्था पोखरल्यागत झाली आहे. अनेक उद्योगांचं खासगीकरण करून या दोन उद्योगांना गालिचे अंतरले जात आहेत. आरक्षण हा विषयच निकालात काढण्यासाठीे खासगीकरणाचा अंगिकार होत असताना लोकांनी आणखी किती कळ सोसावी?

ऊ
जाहिरात

पीएम केअर फंडाद्वारे लोकांच्या पैशांचा खेळ सुरू असताना लोकांनी जाब विचारू नये, असं वाटत असेल तर आता ते दिवस राहिलेले नाहीत. इलेक्ट्रोल बॉण्डद्वारे कोट्यवधींची कमाई करणारा पक्ष पैशांसाठी देशाचं इमानही विकू शकतो आणि तरीही ‘पार्टी वीथ डिफरन्स’ असं खुलेआम सांगतो, राजकीय पक्षांच्या अस्तित्वाला नाकारण्याचा अधिकार खुलेआम वापरतो आणि पुन्हा मी नाही त्यातली, असं जाहीररित्या दाखवण्याचा प्रयत्न करतो, सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या महागाईवर जो एका शब्दात बोलत नाही, तरुणांच्या रोजगारावर ब्र काढत नाही, जातीयवादाचा उघड प्रसार करताना जराही लाज राखत नाही, विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यांचा आधार घेऊन तुरुंगवास घडतो, भ्रष्टाचाराच्या नावाखाली मतं मागताना भ्रष्टाचार केला त्यांचंच पुनर्वसन करतो, प्रचंड खोटं बोलून देशाची बदनामी करतो, निवडणुकीच्या यशासाठी 42 सैनिकांचे प्राण घेतो, गुजरातचं हत्याकांड घडवतो, तो या निवडणुकीत यशासाठी कोणताही मार्ग अवलंबू शकतो. उबग आलेल्या मतदारांना राग व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तेव्हा सावधान रात्र वैर्‍याची आहे…

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!