जागतिक आयुर्वेद परिषदेत डॉ. रामदास आव्हाड यांचा ‘आयुर्वेद विश्वरत्न’ पुरस्काराने गौरव

बंगळुरू | प्रतिनिधी – आयुर्वेदाच्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणारी गौरवास्पद कामगिरी कोपरगावचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांनी केली आहे. बंगळुरू येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या दुसऱ्या चार दिवसीय जागतिक आयुर्वेद परिषद (World Ayurveda Summit) मध्ये त्यांना आयुर्वेद विश्वरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या भव्य परिषदेत जगभरातून ६ हजारांहून अधिक आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. परिषदेतील महत्त्वाच्या सत्रामध्ये पुरुष वंध्यत्व या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉ. आव्हाड यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या संशोधनाधारित अनुभवपूर्ण मांडणीला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डॉक्टर रामदास आव्हाड यांचा आयुर्वेद विश्वरत्न पुरस्काराने गौरव
या परिषदेच्या निमित्ताने भारत व परदेशात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या २० निवडक वैद्यांचा सत्कार करण्यात आला. आयुर्वेद क्षेत्रातील ३८ वर्षांचे निष्ठावंत योगदान, तसेच हजारो विद्यार्थ्यांना घडवून समाजोपयोगी वैद्य घडविण्याच्या कार्याची दखल घेत डॉ. आव्हाड यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला उडुपी मठाधिपती श्री. विश्वप्रसन्न तीर्थ, तसेच कर्नाटक सरकारच्या मंत्री सौ. शोभा कामराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, डॉ. रामदास आव्हाड यांचा हा ५४ वा सन्मान पुरस्कार ठरला आहे.
चार दिवस चाललेल्या या परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रम, रुग्णचिकित्सा सत्रे, ६० हून अधिक आजारांवरील तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, आयुर्वेदिक आहार स्टॉल तसेच २०० हून अधिक औषधी कंपन्यांचे स्टॉल यांमुळे आयुर्वेदाचा जागतिक ठसा अधिक ठळकपणे उमटला.
या प्रतिष्ठित जागतिक मंचावर डॉ. रामदास आव्हाड यांचा झालेला सन्मान हा कोपरगावसह महाराष्ट्राच्या आयुर्वेद परंपरेचा गौरव मानला जात असून, संपूर्ण आयुर्वेद विश्वासाठी तो अभिमानास्पद क्षण ठरला आहे.














