आरोप कितीही झाले तरी ध्येय विचलित होणार नाही – मुकुंद भुतडा
कोपरगाव प्रतिनिधी – कोणी कितीही आरोप-प्रत्यारोप केले, राजकारण कितीही तापले तरी माझे ध्येय एकच प्रभागाचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दृढनिश्चयाने काम करण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार मुकुंद भुतडा यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

गेल्या काही वर्षांत प्रभागात अनेक मूलभूत सोयी-सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. नागरिकांना भेडसावणारे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सोडविणे हा आपल्या कामाचा पहिला टप्पा असणार आहे.

राजकारणात आरोप करणे सोपे आहे; पण खरा आत्मविश्वास कामातून सिद्ध करावा लागतो. मला वाद नव्हे, तर विकास हवा आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्नावर ठोस पावले उचलून नागरिकांना दिलासा देणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे.
नागरिकांच्या अपेक्षा ओळखून आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने व्यापक विकासकामे करणार आहे. नागरिकांचा आशीर्वाद आणि विश्वास मिळाला तर प्रभागाला विकासाच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्याची जबाबदारी मी पार पाडेन,” असा विश्वास देखील नगरसेवक पदाचे उमेदवार मुकुंद भुतडा यांनी व्यक्त केले आहे.












