रेनबो स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने डोळ्यांचे पारणे फिटले…! – डॉ. सुभजित मुखर्जी
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – भव्य रंगमंच… आकर्षक विद्युत रोषणाई… खिळवून ठेवणारे नेपथ्य… अद्ययावत ध्वनी व प्रकाश यंत्रणा… आणि रंगीबेरंगी भरजरी वस्त्रातील जणू काही गंधर्व आणि पऱ्याच वाटाव्यात, अशी देखणी मुले यांचा मंत्रमुग्ध करणारा नृत्यविष्कार…! हे दृश्य होते…रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे …! अर्थात, सप्तरंग २०२३- २४. साक्षात बॉलिवूडचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा वाटावा, असा रंगतदार सोहळा १९ जानेवारी रोजी सायंकाळी साई सृष्टीच्या मखमली हिरवळीवर संपन्न झाला. आणि ही अभूतपूर्व किमया प्रत्यक्षात साकारली,ती रेनबो स्कूल चे कार्यकारी संचालक व प्राचार्य मा. आकाशजी नागरे सर यांच्या अभिनव संकल्पनेतून…!
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेचा १२ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण तज्ञ, भारतीय जल जीवन मिशनचे राजदूत आणि मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक मा.डॉ. सुभजित मुखर्जी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उद्योजक मा. कांतीलालजी अग्रवाल शेठ, सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक मा. आकाश नागरे सर, विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल सर, मा. आनंदजी दगडे सर, मा. सौ. वनिताताई नागरे मॅडम, सौ. दिव्याताई नागरे मॅडम, मा. समीर नागरे सर, कुंभारी गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मा. प्रशांतजी घुले सर, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, शैक्षणिक सल्लागार मा. अविनाशजी शिरसाठ सर, उपप्राचार्य श्री निलेश औताडे सर, कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष श्री पद्माकांतजी कुदळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री अक्षयजी आव्हाड, स्वच्छता दूत व पर्यावरण प्रेमी श्री आदिनाथजी ढाकणे आदि मान्यवर, बहुसंख्य मान्यवर पालक व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर स्वागत गीत व गणेश वंदना नृत्य सादर करण्यात आले. यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा “लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार” स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. सुभजित मुखर्जी सर यांना संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी शेठ अग्रवाल यांचे शुभ हस्ते अतिशय सन्मानपूर्वक शाल, मानपत्र व स्मृती पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला.
प्रमुख अतिथी मा. डॉ. मुखर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, हिरवाईने नटलेली आणि संस्कारांनी समृद्ध असलेली एवढी गुणवंत शाळा बघून मला इथे प्रवेश घेण्याचा मोह होतो आहे. त्यांनी मुलांशी साधलेल्या संवादातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचे व त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांच्या अपार कष्टाचे कौतुक केले. “रेन वॉटर हार्वेस्टिंग” या माध्यमातून भूजल पुनर्भरण कसे करता येते, ग्रे वॉटर मॅनेजमेंट किती किफायतशीर आहे तसेच पर्यावरण व जलशक्ती अभियान याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले.
यानंतर, मा. आकाशजी नागरे सर यांनी पालकांना संबोधित करताना सांगितले की, रेनबो स्कूल ची वाटचाल ही अतिशय यशस्वीपणे चालू आहे. येणाऱ्या भावी काळातील बौद्धिक गरजांचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. मुलांसाठी सर्व सुविधांनी युक्त अद्यावत असे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील नामांकित जोडो या संस्थेशी करार केला असून पुढील वर्षीपासून सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क विना व्याज भरता येणार आहेत. त्यामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाळेमध्ये लवकरच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक केंद्र उभारण्यात येणार आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ध्यान, चिंतन, मनन व योगा यातून सर्वांगीण विकास साधला जाईल. विविध स्पर्धा परीक्षा केंद्र प्रस्थापित करून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच प्रशासकीय सेवेसाठी तयार केले जाणार आहे. तसेच, “प्रोजेक्ट रेनबो” या प्रकल्पातून कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बोरवेल्स ची भूजल पातळी खाली गेलेली आहे, ते बोरवेल्स पुनरुज्जित करण्यासाठी डॉ. मुखर्जी सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे. स्थानिक नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन मा. आकाशजी नागरे सर यांनी केले.
मागील वर्षी दहावीच्या सी. बी एस. सी.बोर्डाच्या परीक्षेत ५३ पैकी २१ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून ९०% पेक्षा अधिक गुण मिळविले व ९८ % गुण मिळवून अव्व्ल स्थान पटकविले. रेनबोच्या या २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. तसेच, ज्ञानदानाची सलग दहा वर्ष अविरतपणे सेवा करणारे श्री दीपक वक्ते व श्री दत्ता डोखे या वंदनीय शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावणारे राष्ट्रीय खेळाडू श्री अक्षय आव्हाड व स्पृहनीय कार्य करणारे श्री आदिनाथ ढाकणे या भूमिपुत्रांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकांच्या अतिशय भरगच्च उपस्थितीने साई सृष्टी लॉन्स फुलून गेले होते. पर्यावरण, बॉलिवूड, देशभक्ती, रामायण आणि दोस्ती या या संकल्पनेची विविध रूपे गीत, संगीत, नृत्यविष्कार आणि नाट्यद्वारे मुलांनी आपल्या कलेतून उलगडून दाखवली आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
अतिशय सुनियोजित अशा रंगतदार आणि दिमाखदार स्नेहसंमेलन सोहळ्याने पालकांमध्ये आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य श्री निलेश औताडे सर व कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.कार्यक्रमाचेअतिशय बहारदार सूत्रसंचालन शिक्षक जी. एम. पगारे व नेहा पहाडे यांनी केले. श्री पगारे यांनी अण्णांचे “पालकांना व शिक्षकांना पत्र ” याचे केलेले भावनिक वाचन याला पालकांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचे आभार मा. नानासाहेब दवंगे सर यांनी व्यक्त केले. यानंतर “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताने स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.