भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल

शिर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी झालेल्या महाविजयाचा शुभारंभ या सभेत ते बोलत होते. यावेळी समवेत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख ,आमदार लहू कानडे, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, आमदार सुनील सातपुते ,संजय फड , मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे, आपचे अजित फाटके,महेश नवले, कैलास वाकचौरे, सुहासराव वाहढणे, नाना बावके, काँग्रेसचे बाबासाहेब ओहळ, इंद्रजीत भाऊ थोरात, सचिन गुजर ,करण ससाने, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले ,लताताई डांगे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशामध्ये सत्य जो बोलतो त्याविरुद्ध ईडी पाठवून कारवाई केली जाते. दक्षिणेमध्ये भाजपचा सुफडा साप आहे .तर उत्तरेमध्ये भाजप हाप आहे. विविध पक्ष फोडूनही त्यांना सत्ता मिळत नाही त्यामुळे दडपशाही सुरू आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना कोणतेही कारण नसताना अटक केली आहे. ज्यांच्यावर डाग नाही ती मंडळी भाजपमध्ये जात नाहीत.

गल्ली ते दिल्ली दहा वर्षे सत्ता असताना भाजपने कोणतेही काम केले नाही .उलट नोटाबंदी फसली आहे. तर काळा पैसा आणता आला नाही. आतंकवाद रोखता आला नाही. तर बेरोजगारी आणि महागाई भरमसाठ वाढवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची विनाअट कर्जमाफी केली होती.
महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते. मोदी गॅरंटी म्हणजे त्यांचा जुमला आहे . त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजय करून स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता जपावी असे आवाहन केले.

तर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. फोडाफोडी आणि पक्षांतराच्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता कधीही थारा देणार नाही. राज्यात मविआ चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार असून जिल्ह्यातही दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, शिर्डी मतदार संघ माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी गावागावांमध्ये विकास कामे पोहोचवली आहे. या उलट समोरचा खासदार हा निष्क्रिय खासदार आहे. कोणतेही काम नाही. कोणतीही योजना नाही. फक्त ते भुलथापा देत आहेत. हे मुंबईचे पार्सल परत पाठवून द्या असे सांगताना समन्यायी कायदा रद्द करून या भागाला पाणी मिळावे याकरता काम करणार आहे.
तर मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, लोकशाही टिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे .वाढती बेरोजगारी आणि महागाईला फक्त भाजपा सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार लहू कानडे, संदीप वर्पे, लताताई डांगे, अजित फाटके, डॉ कडलग करन ससाने ,उत्तमराव घोरपडे यांची भाषणे झाली. यावेळी शिर्डी मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसादभाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज दाखल केला यानंतर राहता शहरामधून आदित्य ठाकरे आमदार गडाख, आमदार कानडे, डॉ.तांबे, रावसाहेब खेवरे यांचेसह विविध पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी तरुणांचा उत्साह यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली