गुन्हेगारी संस्कृतीत आपली मुले भरडणार का ?
राज्यात व देशात परिवर्तनाची नांदी घडवणाऱ्या अनेक चळवळी श्रीगोंदयाच्या मातीत रुजल्या. आधुनिक विचारांना नेहमी बळ देणाऱ्या श्रीगोंदयात आता गुन्हेगारीची नवी संस्कृती रुजू लागल्याचे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. त्याचा आवाज वेळीच ओळखत पोलिसांबरोबरच समाजानेही अलर्ट होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वेळीच ठोस उपाय योजना न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना निर्भीडपणे वावरणेही अवघड होऊ शकते.

स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतरच्या काळातही येथील समाजाने आपली संपूर्ण देशात छाप पाडली. अनेक सामाजिक व सुधारणावादी चळवळी येथे रुजल्या व राज्यभर वाढल्या. अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणारी तशीच शांत व संयमी प्रतिमाही या शहराने जपली. त्यामुळेच बाहेरील अनेक अधिकाऱ्यांनीही आपला अखेरचा काळा शांत व निसर्गरम्य वातावरणात घालविण्यासाठी श्रीगोंदयाची निवड केली. वैयक्तिक वादातून किंवा वर्चस्ववादातून होणारे काही प्रकार वगळता एकंदर शहर व ग्रामीण भागात तसा मोठा क्राईम घडत नव्हता. अन्य शहरांमध्ये विकासाबरोबर त्याचे दुष्पपरिणामही सोबतीला आले. त्यामुळे मुंबईनंतर पुण्याचे गुन्हेगारी कल्चर बदलत गेले; परंतु विकासाची वाट अद्यापही दूर असलेल्या श्रीगोंद्यातील गुन्हेगारी शहराबरोबरच ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अन्य मुलेही २२ ते २५ वयोगटातील आहेत. त्यांच्या रुबाबाला शहर व तालुक्यातील अनेक युवक भूलताना दिसतात. शहरात वावरणाऱ्या गॅंगचा भाग म्हणून ते अभिमानाने मिरवतात; परंतु हीच गोष्ट अनेकांना कायमची आयुष्यातून उठविणारी ठरत आहे. त्यामुळे बदलत चाललेल्या या गुन्हेगारी संस्कृतीत आपली मुले भरडणार नाहीत ना? याची काळजी पालकांनीही घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात युवकांचे नको त्या गोष्टीसाठी होणारे एकत्रीकरण, त्यांच्या चुकीच्या हालचाली याच्यावर समाजातील सुजाण नागरिकांनाही लक्ष ठेवले पाहिजे. नागरिकांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवावी, असा विश्वास पोलिसांनीही नागरिकांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे.
दादा सोनवणे , श्रीगोंदा