
कोकमठाण येथे ३० मार्चपासून सदगुरु जंगली महाराजांच्या पुण्यतिथी निम्मिताने ‘आत्मा मालिक चैत्र महोत्सवा’चे आयोजन
कोपरगाव मनिष जाधव – आत्मा मालिक ध्यान योग मिशन, कोकमठाण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आत्मा मालिक चैत्र महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३० मार्च ते बुधवार दि. १ एप्रिल २०२६ या कालावधीत हा उत्सव शिर्डी-कोपरगाव रोडवरील ‘आत्मा मालिक ध्यानपीठ’ येथे संपन्न होणार आहे.

दैनंदिन धार्मिक कार्यक्रम
महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवशी (३० व ३१ मार्च) पहाटे ५ वाजता श्रीपादुका अभिषेक, आत्मध्यान व काकड आरतीने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत भजन, प्रवचन, मौन ध्यान आणि सद्गुरू दर्शन सोहळा होईल. महोत्सव काळात भाविकांसाठी अखंड ‘महाप्रसादा’चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी हरिपाठ, आरती आणि भजन संध्या असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नामांकित कलाकारांची ‘भजन सेवेची मेजवानी’ असणार आहे. यामध्ये: ३० मार्च: सकाळी आश्रमी कलाकार वृंद आणि सायंकाळी ‘मराठी इंडियन आयडल’ फेम श्री. सागर म्हात्रे यांची भजन संध्या.
३१ मार्च: सकाळी मा. वर्षाताई रजनी पाटील (जाधव) यांची सांप्रदायिक भजन सेवा, तर सायंकाळी श्री. संकेत दरकदार व श्री. जगदीश चव्हाण यांचा कार्यक्रम होईल.
१ एप्रिल: सकाळी कृष्णाबेन कार्तौडीया व महेशभाई बरोलीया यांची ‘गुजराती संतवाणी’ आणि सायंकाळी मनिषाबेन कार्तौडीया व सविता नायगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गरबा’ व सत्संग मंडळाचा कार्यक्रम ‘संत महादेवी हॉल’ येथे रंगणार आहे.
महोत्सवाची सांगता आणि पालखी सोहळा
बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळी हवन विधी व अनुष्ठान सांगता विधी पार पडेल. सायंकाळी ६ वाजता चैतन्यपुरी नगर प्रदक्षिणा (भव्य पालखी सोहळा) काढण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता गुरुमंत्र (नामदान विधी) कार्यक्रम होईल.
तसेच उत्सव काळात तिन्ही दिवस येणाऱ्या सर्व भाविकांनसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले जाणार आहे. या प्रसंगी महोत्सवासाठी देशभरातून तसेच परदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याचे संत परमानंद महाराज यांनी सांगितले व सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा मालिक ध्यान योग मिशन तर्फे करण्यात आले आहे.














