तापमान वाढले, विद्यार्थ्यांचे हाल वाढले ;
शालेय वेळेत तातडीने बदल करून सकाळची घ्यावी
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सध्या वाढत्या तापमानामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून त्याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी, चक्कर येणे आदि तक्रारी शालेय विद्यार्थ्यांचे वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच शाळांनी शालेय वेळेत बदल करून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी अशी मागणी पालकांनी शासन दरबारी, शालेय व्यवस्थापन यांच्याकडे करत आहे.

शाळेत ये-जा करताना रस्त्यावर पडणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर परिणाम होत असून उष्माघाताचा त्रासही जाणवत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन व शिक्षण विभाग तसेच शालेय व्यवस्थापन यांनी सदर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सध्या सुरू असलेल्या शाळांची वेळ बदलून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्यात यावेत, अशी जोरदार मागणी पालकांकडून होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता शासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालकांसह नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.













