२६ जानेवारीपर्यंत नागरिकांचे प्रश्न न सुटल्यास नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन -विवेकभैय्या कोल्हे
-न.प. प्रशासनाच्या गलथान कारभारावरून कोल्हे आक्रमक; नागरी समस्या सोडविण्यासाठी न. प. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिला अल्टिमेटम
कोपरगाव – नगर परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराला नागरिक पुरते कंटाळले असून, गेल्या दीड-दोन वर्षांपासून न. प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या समस्या सोडविण्यात व नागरी सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न. प. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कोपरगाव शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर प्रश्न येत्या २६ जानेवारीपर्यंत सुटले नाहीत तर नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी न. प. मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना दिला.

कोपरगाव शहरातील विविध प्रश्नांबाबत मंगळवारी (३ जानेवारी) नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेली बैठक वादळी ठरली. या बैठकीत युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नगर परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढत न. प. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर मुख्याधिकारी गोसावी व न. प. प्रशासन निरुत्तर झाले. गोसावी व अन्य न.प. अधिकारी प्रत्येक प्रश्नाला साचेबद्ध उत्तर दिल्याने कोल्हे यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा धारण केला होता.
कोपरगाव नगर परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असून, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, स्वच्छता विभागाच्या अनेक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अजूनही भ्रष्टाचार सुरू आहे. सक्षम अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून न. प. प्रशासनाकडून खाजगी एजन्सीला कंत्राट देऊन काम करवून घेतले जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. नगर परिषदेचे खाजगीकरणच झाले आहे. एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या व पदाधिकाऱ्याच्या व ठेकेदाराच्या इशाऱ्यावर नगर परिषदेचा कारभार चालत आहे. मुख्याधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांवर व कामकाजावर कोणतेही नियंत्रण नाही. इच्छाशक्ती नसणारी नगर परिषद अशी कोपरगाव नगर परिषदेची ओळख झाली आहे. अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे, अशा शब्दांत विवेकभैय्या कोल्हे यांनी नगर परिषदेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
कोपरगावला गेल्या अनेक दिवसांपासून आठ दिवसांआड गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांना घाण पाणी प्यावे लागत आहे. पाणी वितरण व्यवस्था कुचकामी ठरली आहे. न. प. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. गोदावरी कालव्याचे आवर्तन सुटले असल्याने नगर परिषदेने आता आठ दिवसांऐवजी तीन-चार दिवसांआड शुद्ध व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करून नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी कोल्हे यांनी केली. मात्र, मला काही मर्यादा आहेत, असे म्हणत मुख्याधिकारी गोसावी यांनी हतबलता दर्शवली.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, योगेश बागुल, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, अशोक लकारे, वैभव गिरमे, शिवाजी खांडेकर, दीपक जपे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, तुषार विध्वंस, खालिकभाई कुरेशी, शफीक सय्यद आदींनी विविध समस्या मांडल्या. शहरातील पाणीप्रश्न, ४२ कोटीची पाणीपुरवठा योजना, न. प. तील भ्रष्टाचार, रस्त्यांचे, गटारीचे निकृष्ट काम, पोलिस परेड ग्राउंडच्या जागेबाबत न. प. ची संशयास्पद भूमिका आदी मुद्द्यांवरून त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.
पाणीपुरवठा, बांधकाम, स्वच्छता विभागाशी संबंधित जलशुद्धीकरण, रस्ते, कचरा संकलन व इतर अनेक कामांमध्ये न. प. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना मुख्याधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप विवेकभैय्या कोल्हे, पराग संधान, संतोष गंगवाल यांनी केला. कोपरगाव शहरातील २७ हजार मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन देऊनही न. प. प्रशासन याबाबत कारवाई का करत नाही? आर.एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेली सुमारे ४० लाखांची देयके वसूल करून सदर एजन्सीस काळया यादीत टाकून सदर एजन्सीसह पेमेंट अदा करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे. तसेच सदरील रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करावी,कोपरगाव शहराला सध्या होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांऐवजी चार दिवसांआड का करता येत नाही? नागरिकांना गढूळ, दूषित पाणी का दिले जाते? पाण्याचे लिकेज काढण्याच्या कामांची बिले दोन-दोन लाखांची कशी निघतात, असे अनेक प्रश्न विवेकभैय्या कोल्हे, पराग संधान व इतरांनी उपस्थित केले.
रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीसाठी काढल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांबाबत गंभीर भूमिका घ्यावी, नागरिकांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागरण करण्याची वेळ येऊ नये यासाठी पाणी सोडण्याचे वेळापत्रक बनवून त्याचे काटेकोर पालन करावे, जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठेकेदारावर कारवाई करून त्याची बिले अदा करू नये, शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून स्वच्छ पाणी द्यावे अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असे कोल्हे यांनी सांगितले.
शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेले अंतर्गत वितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत सपाटीकरण करून काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण त्वरित करावे,नागरिकांना अत्यंत खराब व दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रावर टेंडरच्या नियमानुसार प्रशिक्षित तंत्रज्ञाची नेमणूक करून वेळोवेळी पाणी तपासणी त्रयस्थ सक्षम प्रयोगशाळेत करण्यात यावी, नगर परिषदेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ११ जून २०२१ रोजी ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेला आहे; पण दीड वर्षे उलटूनही ठेकेदाराने हे काम मुदतीत पूर्ण न केल्याने त्याची अनामत रक्कम जप्त करून त्याच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना त्वरित भरपाई मिळावी, शहरातील नवीन हद्दवाढ झालेल्या भागात पिण्याचे पाणी, स्ट्रिट लाईट, भूमिगत गटारी, रस्ते आदी नागरी सुविधा तातडीने पुरवाव्यात, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाची वेळ सायंकाळी ६ नंतर नसावी, मुख्याधिकारी नागरिकांना दिवसा कार्यालयात उपलब्ध असावेत,आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत दैनंदिन कचरा संकलन करण्याची निविदेत तरतूद असताना दररोज कचरा संकलन होत नाही. यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी व आरोग्य अधिकारी म्हणून प्राधिकृत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा मागण्या विवेकभैय्या कोल्हे यांनी केल्या.
बसस्थानकासमोरील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत,शहरात नुकत्याच झालेल्या विविध रस्त्यांची कामे, पेव्हर ब्लॉक व गटारीची कामे अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे झालेली नसून निकृष्ट दर्जाची झालेली आहेट. त्यामुळे सदर कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत टेक्निकल ऑडिट करून सदर कामाचा दर्जा तपासण्यात यावा व दोषीवर कारवाई करावी, शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरीपर्यंतच्या रस्त्याचे काम करताना रहदारीस अडथळा असणारे विजेचे खांब व झाडे न काढता अतिशय निकृष्ट काम झालेले आहे. संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेशाप्रमाणे काम करण्यास सांगावे व तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे बिल अदा करू नये, शहरातील गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहनीराजनगरमधील जनार्दन स्वामी आश्रमापर्यंतचा रस्ता तातडीने दुरूस्त करावा, प्रभाग क्र.९ मधील धारणगाव रोड ते शिवशांती इस्टेट परिसरातील खाजगी ले-आऊटमध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम करण्याचा नगरपालिकेला अधिकार नसतानाही हे काम केले असून, सदर काम करणाऱ्या ठेकेदार, अधिकारी व खाजगी ले-आऊटचे मालक यांच्यावर कारवाई व्हावी, प्रभाग क्र.८ मधील संजयनगर भागातील भूमिगत गटारीचे काम अतिशय निकृष्ट झालेले असून, हे काम योग्यरितीने करण्यास संबंधित ठेकेदारास आदेश द्यावेत,
कोपरगाव बेट, मोहनीराजनगरमधील नवीन वसाहतीत बंदिस्त गटार व जलवाहिनीचे काम त्वरित करावे, लक्ष्मीनगर भागातील पाण्याची टाकी तातडीने दुरूस्त करावी, लक्ष्मीनगर, सुभाषनगर, संजयनगर, गांधीनगर, इंदिरानगर, हनुमाननगर, गोरोबानगर, गजानननगर, मोहनीराजनगर, लिंबारा मैदान, टाकळी नाका, खडकी आदी परिसरातील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांच्या नावावर ७/१२ उतारे करून द्यावेत, शहरात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी खोका शॉप त्वरित उपलब्ध करून द्यावे, अनुकंपा तत्वावर २२ वारसदार अर्जदारांना शासनाच्या नियमाप्रमाणे त्वरित कामावर घ्यावे, नगर परिषदेसमोरील माधव बाग उद्यानात स्वातंत्र्यसेनानी माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा.
धारणगाव रोडवरील लक्ष्मीनगर ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा रस्त्यावरील प्रस्तावित भूमिगत गटार ४ फुटी पाईप टाकून करण्यात यावी, शहरातील नागरी सुविधापासून अद्यापपर्यंत वंचित असलेल्या भागात तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक अशोक लकारे, प्रसाद आढाव, संदीप देवकर, वैभव आढाव, दीपक वाजे,किरण सुपेकर, शंकर बिऱ्हाडे, फकीर मोहम्मद पैलवान, शफीक सय्यद, रंजन जाधव, पप्पू पडियार, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे आदींसह भाजप, शिवसेना, रिपाइं, मनसेचे पदधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.