रेनबो स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे यांच्या स्मृतींना अभिवादन…!
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या परिसस्पर्शाने जीवनाच्या विविध क्षेत्रात शिक्षणाची बीजे पेरून भाग्यवंतांचे मळे फुलविले… ते जेऊर कुंभारीचे सुपुत्र… शिक्षणाचे आद्य प्रवर्तक…शिक्षणमहर्षी गणपतराव विठोबा तथा लहानुभाऊ नागरे अण्णा यांच्या तिसऱ्या पावन स्मृतीस प्रती शांतीनिकेतन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी, प्रमुख अतिथी अण्णांचे जिवलग सहकारी व संस्थेचे चेअरमन मा. कांतीलालजी शेठ अग्रवाल तसेच सचिव मा. संजयजी नागरे, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उप प्राचार्य श्री निलेश औताडे सर, प्रशासन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम, मान्यवरांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता काळे मॅडम यांनी सादर केले. यानंतर, कलाशिक्षक दत्ता डोखे यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, अण्णा म्हणजे साक्षात एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. शाळा आणि विद्यार्थी हाच त्यांचा ध्यास होता. शिक्षण व त्यातील नवनवीन संकल्पना हेच त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नि क्षण त्यांनी शिक्षणासाठीच समर्पित केला. म्हणूनच, आजही या ज्ञान मंदिरातील अण्णांच्या पवित्र पाऊल खुणा चिरंतन, चिरदायी आहेत.
यानंतर,कार्यक्रमाचा समारोप करताना सर्वांनी जागेवर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अण्णांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी, आजही विद्यार्थ्यांच्या मनातील अण्णांबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यश्री पंडोरे व समृद्धी माकोणे या विद्यार्थिनींनी केले तर आभार समन्वयक मोनाली सुराळे यांनी व्यक्त केले.