बेलवंडीतील चोरीप्रकरणाची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार…
साहेब बेलवंडीतील चोऱ्यांचा तपास कधी लागणार- बेलवंडी व्यापारी असोसिएशन
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे – गेल्या सहा महिन्यांपासून बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्याचे सुरू झालेले सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. झालेल्या चोऱ्यांपैकी एकाही चोरीचा तपास अजून लागलेला नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह बेलवंडी पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.त्यामुळे भारतीय मानव विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप शिंदे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे बेलवंडीच्या वाढत्या चोरी सत्राची तक्रार केली आहे. मागील सहा महिन्यांपासून बेलवंडी गाव चोरांनी टार्गेट केले असून आतापर्यंत 20 ते 25 चोऱ्या झाल्या असून त्यातील काही तक्रारी दाखल झाल्या तर काही नागरिकांनी तक्रारी दाखल करण्यास घाबरत आहेत. त्यातील एकही चोर पकडण्यात बेलवंडी पोलिसांना अद्याप यश आले नसल्याने जनतेतून अनेक उलतसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बेलवंडी पोलीस निरीक्षक दुधाळ यांना आतापर्यंत बेलवंडी गावात झालेल्या चोऱ्यांपैकी एकाही चोरीचा छडा लागलेला नाही आरोपी पुन्हा पुन्हा बेलवंडी पोलिसांना आव्हान देऊन बेलवंडी गावातच चोरी करत आहेत. आरोपी वेगळे नसून तेच आरोपी वारंवार बेलवंडी गावात चोरी करत आहेत असे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून येत आहे. त्याचबरोबर साहेब बेलवंडीतील चोऱ्यांचा तपास कधी लागणार ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी..मागील 4 महिन्यांपूर्वी एकाच रात्रीत 10 ठिकाणी चोरीतील प्रकरणात कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले होते की आरोपी निष्पन्न झाले असून लवकरच आठ दिवसांत आरोपीना अटक करू असे आश्वासन दिले होते परंतु डीवायएसपी जाधव यांनी दिलेले अश्वासन हवेत गेल्याने आणि बेलवंडी पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिला नसल्याने याकडे आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे. अशी मागणी बेलवंडी व्यापारी असोसिएशन करत आहेत.
बेलवंडी पोलिसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार..बेलवंडी गावात वारंवार चोऱ्या होऊन देखील एक पण चोर पोलीसांना सापडत नाही चोरी, दरोडा यात एखादा बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल भारतीय मानव विकास सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याने विनाकारण बेलवंडी येथील एका सर्वसामान्य व्यवसायिकास त्रास दिल्याची तक्रार शिंदे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.