प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे २३८ लम्पीग्रस्त जनावरांच्या मृत्यू ; जिल्ह्यातील ५६८ गावात लम्पीचा शिरकाव
पशुधनाच्या मालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – आकाश नागरे
कोपरगाव प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यात लम्पी स्कीन या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात २३८ जनावरांचा मृत्यू झाला आहे लम्पी आजाराबाबत योग्य ते नियोजन करण्यास प्रशासनाला अपयश आले असुन मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांचे विशेष सहकार्याने शासनदरबारी पाठपुरावा करणार तसेच पशु पालकांनी लम्पी आजाराबाबत सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.
अकोले(०२), जामखेड (०४), कर्जत (०४), कोपरगाव (२९), नगर (११), नेवासा (२६), पारनेर (०६), पाथर्डी (३२),राहता (११), राहुरी (४०), संगमनेर (०१), शेवगाव (३५), श्रीगोंदा (३०), श्रीरामपूर (०७) जिल्ह्यात असे ऐकून २३८ जनावरांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच ०४ हजार ०२२ जनावरे बाधित असुन यापैकी ०३ हजार ०१९ जनावरे उपचारांमुळे बरे झाले. ४० बाधित जनावरे गंभीर असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ७६५ सक्रिय जनावरे आहेत. जिल्ह्यातील ५६८ गावात लम्पीचा शिरकाव होवुन इतर ठिकाणी वाढत आहे.
पशुपालकांनी आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे. जनावरांना स्वच्छ पाणी व मऊ लुसलुसीत खाद्य द्यावे. जनावरांना आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्त्वे पूरक खाद्य म्हणून देण्यात यावी. सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.