पर्यावरण तज्ञ डॉ. सुभजीत मुखर्जी यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार जाहिर
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार, शेती, जलसिंचन व पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याची व त्यांच्या गौरवाची परंपरा कायम ठेवत यंदाचा शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार प्रख्यात पर्यावरण तज्ञ, ग्रीन मुंबई मिशनचे संस्थापक डॉ. सुभजीत मुखर्जी यांना नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती कार्यकारी संचालक व प्राचार्य मा. आकाशजी नागरे यांनी दिली.
मराठी माणूस हा परंपरांचा आदर करणारा आहे. त्यांना जपणारा आहे आणि त्यांची कास धरूनच आधुनिकतेकडे झेप घेणारा देखील आहे. त्याच परंपरेचा मान ठेवत यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रथमच अमराठी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे. पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल,हवा, ध्वनी भू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दूषितिकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. याच गोष्टीवर डॉ. सुभजीत मुखर्जी यांनी अतिशय मूलभूत संशोधन करून हा निष्कर्ष काढला की, जैववैद्यकीय कचरा जो मातीमध्ये जोडला जातो. त्याचा परिणाम मातीच्या वनस्पती आणि जीवजंतू वर होतो. म्हणून पावसाच्या पाण्यातून शहरीभागातील भूजल पातळी वाढवण्याकरिता नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवणारे प्रख्यात पर्यावरण तज्ञ डॉ. सुभजीत मुखर्जी यांचे अतुलनीय योगदान आहे.
डॉ. सुभजीत मुखर्जी हे मूळचे पश्चिम बंगालचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. डॉ. मुखर्जी हे मिशन ग्रीन मुंबई या एनजीओ चे संस्थापक आहेत. भारत सरकारच्या जलजीवन मिशनचे ते राजदूत असून त्यांना भारताचे वॉटर हिरो म्हणून संबोधण्यात येते. त्यांनी मुंबई, दिल्लीसह संपूर्ण भारतात सुमारे २०,००० भूजल पुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बॅरल्सची कल्पना राबवली आहे. त्यांनी लिहिलेल्या “जलसंचय – द अर्बन वॉटर इन्शुरन्स” या अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या संपूर्ण भारतभर व भारताबाहेर सुमारे एक लाखाहून अधिक प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे देखील ते अॅम्बेसेडर आहेत. गेल्या सहा वर्षात एक लाख ८० हजार झाडे लावून त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखला आहे. झाडे जगवायचे असतील तर पहिले पावसाच्या पाण्याची बचत करुन भूजल पातळी वाढवली गेली पाहिजे असे डॉ. मुखर्जी सांगतात. सन २०२१ मध्ये प्रतिष्ठित असा ‘मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार’ त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते बहाल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ते श्री साईबाबांचे परमभक्त आहेत.
सदर पुरस्काराचे वितरण येत्या शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी होणाऱ्या रेनबो स्कूलच्या दिमाखदार स्नेहसंमेलन सोहळ्यात सायंकाळी ४ वाजता साई सृष्टी लॉन्स, शिर्डी- कोपरगाव रोड, तीन चारी येथे होणारआहे. तरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक व प्राचार्य मा. आकाशजी नागरे सर यांनी केले आहे.