पक्षप्रवेशासाठी दबाव टाकणाऱ्या आमदार काळे यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध ग्रामस्थांचा निषेध
विकासकामे रोखण्याच्या धमकी देत होणाऱ्या प्रवेशांचे काळेंना निवेदन
कोपरगाव तालुक्यातील लौकी परिसरातील ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांना निवेदन देत, काही कार्यकर्त्यांकडून गावातील जनतेवर काळे गटात प्रवेशासाठी केला जात असणाऱ्या दबावाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. लोकशाहीची हत्या होणाऱ्या या दुर्देवी प्रकाराचा आमदार काळे यांना रोखून त्यांच्याच कार्यकर्त्यांबद्दल संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून काळे यांचे काही कार्यकर्ते असा प्रचार करत आहे की जर पक्षप्रवेश केला, तरच गावात रस्ता होईल, नवीन डीपी दिली जाईल आणि विविध विकासकामांना निधी मिळेल. अन्यथा निधी मिळणार नाही आणि त्याचा वापर करू देणार नाही.या विधानामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की विकासकामे, शासकीय योजना आणि जनतेचे मूलभूत हक्क यांना कोणत्याही राजकीय दबावाशी जोडणे हा लोकशाहीचा अवमान असून, शासनाच्या मूल्यांचा अपमान आहे. ग्रामस्थ विकासासाठी काळे यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली झुकणार नाहीत.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही पक्षविरोधी नाहीत परंतु गावाच्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्या राजकीय गोंधळाला ते मान्यता देणार नाहीत. शांततामय मार्गाने, संविधानिक हक्कांचा वापर करून ते आपला निषेध नोंदवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.गावातील सर्व विकासकामे पक्षनिरपेक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावीत.कोणत्याही कार्यकर्त्यांकडून दबाव किंवा धमकी दिल्यास त्याची चौकशी करण्यात यावी.रस्ते, डीपी, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या कामांसाठी स्वतंत्र शासकीय मंजुरी द्यावी ते अडवून धरून गावाला वेठीस धरू नये.ग्रामस्थांच्या विचारांना व मतांना आदर देऊन लोकशाही मूल्यांचे पालन करावे.
ग्रामस्थांनी शेवटी असा इशारा दिला आहे की, गावातील विकासकामे जर राजकीय हेतूंसाठी अडवली गेली, तर ते लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत.रविंद्र वलटे, सचिन खटकाळे, प्रदीप खटकाळे, गणेश खटकाळे, बापूसाहेब खटकाळे, अनिल आहेर,रमेश खटकाळे, भाऊसाहेब कदम,दत्तात्रय खटकाळे,मुकेश खिलारी,शैलेश खिलारी आदींसह ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.