टाकळीमियात मंगळवारी धडकणार राजू शेट्टी यांची तोफ
टाकळीमियात ऊस परिषद ; शेतकऱ्यांनी ऊस परिषदेला उपस्थित राहावे-रवींद्र मोरे
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे – शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणारे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या नावावर वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचा मलिदा खाऊन धनदांडगे झालेले कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही. मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली खोटी चादर ओढून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे ज्यावेळी शेतकऱ्यांची हक्काची लढाई लढण्याची वेळ येते तेव्हा कुठे जाते? असा प्रश्न अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी विचारला आहे. रवींद्र मोरे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की दिनांक १ ११ २०२२रोजी टाकळीमिया मध्ये राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी ऊस परिषदेचे आयोजन केले आहे.
रवींद्र मोरे यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला ज्यावेळेस भाव नसतो त्यावेळेस मैदानामध्ये निडरपणे कोणत्याही पक्षाला जाब विचारण्याचा तसेच सरकारच्या मनगटीवर बसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा शेतकऱ्यांचा हक्काचा जो कोणी नेता असेल तर ते फक्त राजू शेट्टी साहेब आहेत. मात्र आपली राजकीय पोळी भाजून घेणारे शेतकऱ्यांच्या लढाईसाठी पुढे येत नाहीत. अशांना शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. दिनांक १-११-२०२२ रोजी टाकळीमिया मध्ये परिषदेचे आयोजन केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांचा जुलुमी कारभार शेतकऱ्यांच्या उसाला काडीमोल भावामध्ये विकत घेणाऱ्या कारखानदारांचा आता अंत केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या ऊस परिषदेसाठी अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र मोरे यांनी केले आहे.
प्रामुख्याने मागील वर्षाच्या उसाला एफआरपी अधिक ३०० रुपये देण्यात भाव देण्यात यावा सर्व कारखान्यांची वजनकाटे ऑनलाइन होऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साखर आयुक्तांकडे मागणी करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.