पुणे : अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजासंदर्भात केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.

“नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. सर्व जाती आणि धर्मातील लोकांची हजामत करून, सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रोजीरोटी कमावतात. त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांचे ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळा निर्माण करून घेऊ नये. भुजबळ यांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे. कोणाच्या तरी स्क्रिप्टनुसार भाषणबाजी करू नये, अन्यथा त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.