गोदावरी लाभक्षेत्राच्या
हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाची तयारी – कोल्हे
-हक्काच्या पाण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत कोपरगावात लाक्षणिक उपोषण
कोपरगाव : नगर व नाशिक जिल्ह्यात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मुळा, प्रवरा, गंगापूर व दारणा धरण समूहातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. हे संपूर्ण पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार नाही. पाण्याचा मोठा अपव्यय होणार आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी? असा सवाल करून आमच्या हक्काचे एक थेंबही पाणी वाया घालवले तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिला

गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील हक्काचे पाणी वाचविण्यासाठी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या वतीने संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (३ नोव्हेंबर) कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणास मोठा प्रतिसाद मिळाला. उपोषणकर्त्यांच्या वतीने स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे व तहसीलदार संदीप भोसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती असून, पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी जी आवर्तने द्यावी लागणार आहेत त्यात पाण्याचा प्रचंड व्यय (लॉसेस) होणार आहे. त्यामुळे पाण्याची मोठी तूट निर्माण होणार आहे. त्यामुळे कालबाह्य झालेल्या मेंढेंगिरी समितीच्या अहवालाचा फेरविचार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल आल्याशिवाय, मुळातच तूट असलेल्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असल्याने अगोदर नव्याने पाणीसाठ वाढवावा व मगच नियोजन करून पाण्याचे वाटप करावे, गोदावरी कालव्यांना पिण्याच्या व शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन तात्काळ जाहीर करावे, गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील स्थगित केलेले बारमाही ब्लॉक त्वरित चालू करावेत, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, कोपरगाव व राहाता हे दोन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवावे, वैतरणा धरणाच्या सँडल गेटचे व ३० वळण बंधाऱ्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे, दमणगंगा, पिंजाळ, उल्हास, वैतरणा खोऱ्यातील योजना तातडीने पूर्ण कराव्यात, वैतरणा धरणाची साठवण क्षमता वाढवून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवावे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.
स्नेहलताताई कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, कमी पर्जन्यमानामुळे सध्या कोपरगाव तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकारने हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेला नाही. त्यातून विद्यमान आमदारांचे अपयश समोर आले आहे. कोपरगाव तालुक्यातील जनता सध्या दुष्काळाचे चटके सोसत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे; पण निष्क्रिय आमदारांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. आधीच गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचा खेळखंडोबा झालेला आहे. त्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडल्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेती उजाड होणार आहे. तरीही आमदार गप्पच आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेंगिरी समितीचा अहवाल कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्यांसाठी अन्यायकारक असून, या अहवालाचा फेरविचार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाने अहवाल दिल्याशिवाय जायकवाडीत पाणी सोडू नये, जायकवाडीसाठी कमतरता असलेले ५ टीएमसी पाणी मृतसाठ्यातून वापरण्यास सरकारने परवानगी द्यावी, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी आयुष्यभर पाण्यासाठी लढा दिला. त्यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार आम्ही शेतकरी व जनतेला सोबत घेऊन कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी लढा पुकारला आहे.

विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य पाणी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खर्ची घातले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना स्व. कोल्हेसाहेब यांनी कोपरगाव तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. पाणीप्रश्नासाठी संघर्ष करण्याची कोल्हे कुटुंबीयांची परंपराच आहे. आम्ही जरी आज भाजपमध्ये असलो तरी आमच्यासाठी सर्वात आधी येथील शेतकरी महत्त्वाचा आहे. जो पक्ष कोपरगाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवेल, तोच आमचा पक्ष आहे. आमदारांनी मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे; पण आम्ही गोदावरी कालव्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरू केला आहे. यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेंगिरी समितीच्या अहवालानुसार नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा मोठा फटका गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राला बसणार आहे. सरकारने पाण्याच्या बाबतीत कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्यावर होत असलेला अन्याय तातडीने दूर करावा, अन्यथा हक्काच्या पाण्यासाठी यापुढील काळात मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

राज्य सरकारने सन २००५ मध्ये मेंढेगिरी समितीच्या चुकीच्या अहवालावरून घाईघाईने मंजूर केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्यात अनेक त्रुटी असून, या कायद्याचे नाव जरी समन्यायी पाणी वाटप कायदा असे असले तरी कोपरगाव तालुक्यासह नगर-नाशिक जिल्ह्यातील जनतेवर अन्याय करणारा हा काळा कायदा आहे, तो रद्द झाला पाहिजे. मेंढेंगिरी समितीच्या अहवालाचा फेरविचार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाने ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आपला अहवाल देणे अपेक्षित असताना अद्याप अहवाल सादर केलेला नाही. अभ्यास गटाने अहवाल दिल्याशिवाय जायकवाडीत पाणी सोडण्यात येऊ नये. आम्हाला हक्काचे पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे. अतितुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात आधी नवीन पाणीसाठा वाढवावा व मगच फेरनियोजन करून पाण्याचे समान वाटप करावे. नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा यांच्यात पाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. पाण्यासाठी चाललेला हा प्रादेशिक वाद सामंजस्याने मिटविण्याची गरज आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवल्यास नगर, नाशिक मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. त्यासाठीच्या प्रस्तावास स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी सन २००० मध्ये विधिमंडळात मान्यता घेतलेली असून, ही योजना तातडीने पूर्ण होण्यासाठी नगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणे सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे आवाहन कोल्हे यांनी केले.
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पूजन करून या उपोषणास प्रारंभ झाला. यावेळी उपोषणकर्त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द झालाच पाहिजे, कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, मेंढेंगिरी समितीचा धिक्कार असो, मराठवाडा उपाशी, नगर-नाशिक तुपाशी, कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणा देऊन तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक रमेश घोडेराव, विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, नीलेश देवकर, अप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, माजी उपाध्यक्ष अरुणदादा येवले, संजय होन, साईनाथ रोहमारे, मधुकर वक्ते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, सुनील देवकर, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाळासाहेब मांजरे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, संचालक राजेंद्र गायकवाड, रिपाइंचे सचिव दीपक गायकवाड, मच्छिंद्र केकाण, उत्तमराव चरमळ, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, विजय आढाव, रवींद्र पाठक, अनिल सोनवणे, शिवसेनेचे कैलास जाधव, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वैशालीताई आढाव, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, अतुल काले, संजय जगदाळे, अशोकराव लकारे, जनार्दन कदम, दीपक जपे, वैभव गिरमे, नसीरभाई सय्यद, गोपीनाथ गायकवाड, विवेक सोनवणे, कैलास खैरे, वैभव आढाव, सुशांत खैरे, प्रसाद आढाव, दादासाहेब नाईकवाडे, चंद्रकांत वाघमारे, खालिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, हाशमभाई पटेल, इलियास खाटिक, अल्ताफभाई कुरेशी, सरपंच डॉ. विजय काळे, रवींद्र आगवन, यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, मुकुंद काळे, दीपक चौधरी, सचिन सावंत, पिंटू नरोडे, जयेश बडवे, पिंकी चोपडा, शंकर बिऱ्हाडे, जयप्रकाश आव्हाड, संतोष नेरे, मुन्ना दरपेल, सिनू भाटिया, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, सतीश निकम, विक्रांत सोनवणे आदींसह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब वक्ते, अनिल सोनवणे, सुनील देवकर, साहेबराव रोहोम, बबनराव निकम, कैलास माळी, निवृत्त अभियंता सुराळे आदींची भाषणे झाली.
विवेकभैय्या कोल्हेनगर नाशिक मराठवाडा सर्व शेतकरी,संघटना,नेत्यांनी एकत्रित येऊन पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी रेटा लावल्यास कायमचा हा प्रश्न निकाली निघेल व संघर्ष टळेल यावर सर्वांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी मनमानी निर्णय घेऊन कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी हिरावून घेत आहेत. जायकवाडीला साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होत असताना अशा महत्वाच्या वेळी कोपरगावचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत त्यांना पाण्याच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे-घेणे नाही का असा सवाल उपस्थित शेतकरी वर्गातून विचारण्यात आला आहे