“आठवणीतले दिवस “
फुलाज्जी
काल साळवेचा फोन आला.. आपली फुलाज्जी गेली म्हणून. मनाचा एक हळवा कोपरा डोळ्यात दोन थेंब घेऊन उभा राहिला. झरकन नोकरीचा पहिला दिवस आठवला.
सकाळपासूनच पाऊस पडत होता.प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आलेली.मला निघावं लागणार होतं. दिवसभर पाऊस रीपरिपत होता. प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाल्याचा आनंद तर होताच पण एकदम अनोळखी गाव. जत सांगली मधील एक छोटेसे खेडे..झाली असतील विसेक वर्ष.पाऊस चालूच. कसातरी एसटी तुन बाहेर आलो. हातात मोठी सामानाची पेटी आणि एक शबनम सोडून काही नव्हतं. साधी छत्री ही नव्हती. समोर दिसणाऱ्या चहाच्या टपरीत जरा बसलो.चहा घेतला.जुजबी चौकशी केली. त्याने दूर बोट करून शाळेकडे निर्देश केला. तिथे गेलो तर कुणाचाच पत्ता नव्हता. दोघे जण आधीच येऊन थांबले होते, एक साळवे आणि एक बारशिंगे आणि त्यात मी मिसळलो. त्यांचीही नेमणूक त्याच शाळेत झालेली.पाऊस थांबल्यावर रूम शोधली सापडेनाच शेवट सरपंच गाठला. त्याने विचारलं “लग्नबिग्न झालंय का?”आम्ही हसत म्हणालो “नाही.”सरपंच मंग तुम्हांला ग्रामपंचायतीची खोली उघडून देतो तित्त बिनघोर रहावा. कसय तुम्ही शिकलेली माणसं.”हा नाही करता ग्रामपंचायतीचा एक कोपरा पदरात पडला, स्वयंपाक तर फक्त साळवेलाच जमायचा, मला काही अनुभवच नाही. तीच गत बारशिंगेची.साळवे तरबेज माणूस. गावात मेस नाही, खानावळ मिळेना, साळवेनी शक्कल लढविली आपणच स्वयंपाक करू. पण भाकरी जमेना. बाहेर कुणी भाकरी बनवून देते का? त्याचा शोध घेतला..शेवट गावातील काहींनी फुलाज्जीचा पत्ता दिला.आम्ही साळवेला मदत सोडून काही करु शकत नव्हतो. मला तो म्हणाला” तू काहीच करू नको मी स्वयंपाक करताना फक्त गप्पा मार”.दिवस असे मजेत जात होते. भाज्या घरी बनवायचो आणि गावातील एक वयस्कर बाई तिला सारं गाव फुलाज्जी म्हणायचं. दोन शेळ्या आणि साधीशी झोपडी हेच तिचे जग. दोन् मुलं होती पण ती मुलांमध्ये रहात नव्हती. आम्हाला मात्र भाकरी करून द्यायची. त्याबद्दल्यात आम्ही पैसे द्यायचो. दिवस बसून रहात नाही.हळू हळू आमच्या बदल्या झाल्या, जत्रा पांगल्यासारखी पांगापांग झाली. फुलाज्जी च्या हाताला चव होती. साक्षात अन्नपूर्णा असल्यागत. माझ्याकडे नोंकियाचा ब्लॅक व्हाईट फोन होता. चार्जिंगला मुल्ला मुलाणी च्या दुकानावर न्यावा लागे. गावात लाईटच नव्हती. चार्जिंग केलेला फोन कसाबसा आठ दिवस चालायचा. त्यावर कधी कधी रेंज पकडली तर एफ. एम. चालायचं.पुढे गावाकडे बदली झाली.. माझं लग्न जमलं.. फुलाआजीला पत्रिका पाठवली. फोन केला. म्हणाली, “माझ्या दोन शेळ्या हायेत, त्या उपाशी रहातीन, सांग कसं येऊ?”शेवटी नाईलाज झाला.नाही आली लग्नाला. असेच कामानिमित्त एकदा वाडीला गेलो. फुलाआजी भेटली. तिला म्हंटलं “चल माझ्याबरोबर गावात जाऊन येऊ..” आली ती. म्हंटल “तुला हवी ती साडी पसंत कर”, ती संकोचली.. म्हटलं तुझा पोरगा समजून घे.. म्हातारीने भारी
ईर्कल घेतलं, चोळीचा खण घेतला.. म्हंटल “चल माझ्या नोकरीच्या गावी”.. हसत” न्हाई म्हणाली”, दोन्ही हाताचा मुटका करून माझी अलाबला केली.जशी माझी खरी आज्जीच.मी निघालो, उगाचच डोळ्यांचं आभाळ भरून आले. तिच्या पाया पडलो..तर तिच्याही डोळ्यात पाणी तरळत होतं.
.. कोण कुठला मी.. कोण कुठली फुलाज्जी. आणि हे कोण्या जन्माचे ऋणानुबंध..ना नात्याचे ना गोत्याचे आजवर अनेक ठिकाणी जेवलो असेल, भाकरी ही खाल्ली असेल.. पण फुलाज्जी सारख्या कुणालाच जमल्या नाही भाकरी .आज अचानक बारशिंगेचा फोन आला.. आता तोही दूर च्या शाळेत होता साळवेसारखाच प्रपंच्याच्या रेघरूपाला लागला होता. बारशिंगे म्हणाला “आपली फुलाज्जी गेली यार “. कोण कुठली म्हातारी पण आमच्या तिघांच्याही जीवनाचा एक कोपरा हळवा केला तिने.माझंही डोळ्यांचं आभाळ भरून आलं. अन त्याचंही…
लेखक :संतोष तांदळे
माध्यमिक विद्यालय, ब्राहमणगाव*. *ता. कोपरगाव जि*. *अहमदनगर
8830077974,9561819499